एक आटपाट नगर होतं. ऐश्वर्य संपन्न आणि निसर्ग समृद्ध. त्या नगरीच नाव सिद्धांचल . 

सिद्धांचल नगरीचा राजा सिद्धेश्वर आणि त्याची एकुलती एक लाडकी राजकन्या सिद्धी.
पराक्रमी राजा सिद्धेश्वरसारखी राजकन्या सिद्धीही लहानपणापासूनच फार हुशार, चाणक्ष आणि देखणी होती. सगळ्या राजकीय कला आणि क्रीडा तीला अवगत होत्या.
राजगृही सगळं अलबेल चालू होतं. हसती-खेळती राजकन्या हळूहळू मोठी होत होती. राजकन्येचं जसं जसं वय वाढत गेलं तशी राजाचीही काळजी वाढू लागली. 

आपल्या सर्वगुणसंपन्न राजकन्येला साजेसा जोडीदार मिळावा म्हणून त्याचे प्रयत्नही सुरु झाले.
लाडक्या राजकन्येला सुयोग्य वर लाभावा म्हणून राजाने दरबारात सहमताने स्वयंवराची घोषणा केली. स्वयंवराचा दिवस ठरताच; विविध राज्यातील योद्धे, राजपुत्र, पराक्रमी वीर, सर्वोत्तम कलाकार, आचार्य, पंडीत आदींना निमंत्रणे पाठवली गेली. राजमहालात स्वयंवराची जोरदार तयारी सुरु झाली. जागोजागी तांब्या-पितळेच्या मोठाल्या समया, शोभेची कारंजी,  फुलांची तोरणं, माळा, रंगीबेरंगी मखमली पडदे, उंची वस्त्र, उत्तम मिष्ठान्न सगळीकडे सगळ्यांची लगबग सुरु झाली.
राजकन्येच्या स्वयंवराचा दिवस उगवला आणि राजमहाल दुमदुमू लागला. महालाच्या दिशेने सजलेले रथ, अंबारी, बैलगाड्या धावू लागल्या. सगळ्या पंचक्रोशीतले रहिवासी सिद्धांचल नगरीत दाखल झाले होते.
जागोजागी दिव्यांची आरास, फुलांच्या रांगोळ्या, सुवासिक अत्तरे, झेंडूची तोरणे या सा-याने वातावरण आगदी प्रसन्न झाले. अनेक देशो- देशीचे शूरवीर योद्धे, राजपुत्र, कलाकार, आचार्य, पंडीत, क्षत्रिय, नर्तक राजदरबारात उपस्थित झाले. सुंदर रेशमी गुलाबी रंगाचे वस्त्र नेसून राजकुमारी सिद्धी सनईच्या सुरात दरबारात हजार झाली. तिचं सौन्दर्य पाहून सगळेच थक्क झाले. राजकुमारी अप्सरेसारखी अनुपमा दिसत होती.  स्वयंवराचा पण ऐकण्यासाठी सगळ्यांचे कान आतुर झाले. नगारे वाजवत राजगृहातील राजहत्तीला दरबारातील रिंगणात आणून अगदी मधोमध उभ करण्यात आलं  आणि “जो कुणी पुरुष राजघराण्याच्या राज हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय वर करून दाखवेल त्याच्याशी राजकन्येचा विवाह होईल आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल.” अशी डंका वाजवून घोषणा करण्यात आली.
घोषणा ऐकून सगळे प्रेरित झाले, शक्ती परिक्षणासाठी सिद्ध झाले आणि स्वयंवर सुरु झालं.
प्रत्येकाला स्वसामर्थ सिद्ध करण्याची समान संधी देण्यात आली.
प्रत्येक वीर पुरुष येत होता आपल्या बाहुबळावर पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता पण राजहत्तीसमोर कुणाच काही चालेना आणि हत्तीची सोंड आणि पुढचे दोन पाय काही वर होईनात.
जसजसे उमेदवार कमी होत गेले, राजाच्या चेहऱ्यावरचे भाव चिंताक्रांत झाले. एकही वीर पुरुष या स्वयंवरात नाही अशी शंका मनात बळ धरू लागली. आपल्या वडिलांची अवस्था पाहून राजकन्येला रडू कोसळणार एवढ्यात एक सडपातळ शरीरयष्ठीचा शांत आणि संयमी तरुण सभामंडपी अवतरला. राजासमोर नतमस्तक झाला आणि एका संधीसाठी प्रार्थना करू लागला. त्या किरकोळ शरीरयष्टीच्या तरुणाला पाहून सभामंडपातले सगळेच वीर हसू लागले. “जे आम्हाला जमले नाही, ते याला कसे जमेल” अशी चेष्टा करू लागले. राजाने हात उंचावून सगळ्यांना शांत केले आणि मोठया जड मानाने त्या तरुणाची प्रार्थना मान्य केली.
संधी मिळताच तो तरुण हत्ती समोर जाऊन उभा राहिला. सभामंडपात शांतता पसरली. हत्तीचा रिंगणाला एक फेरी मारून हत्तीच्या पाठीमागे थांबला. सगळा राज दरबार आता काय होणार या प्रतीक्षेत असताना त्या तरुणाने हत्तीची शेपूट दोनी हातात धरून जोरात खाली ओढली. हत्तीला प्रचंड वेदना झाली, हत्ती बिचारा कळवळला, त्याने जोरात ओरडण्यासाठी आपली सोंड आणि पुढचे दोन पाय वर केले. दरबारात सगळ्यांच्या डोळ्यादेखत चमत्कार झाला. राजाने ठेवलेला स्वयंवराचा पण पूर्ण झाला, राजाला समाधान आणि राजकन्येला अपूर्व आनंद झाला. राजकुमारी सिद्धीला अत्यंत हुशार आणि चतूर जोडीदार लाभला होता. आगदी थाटामाटात राजकन्येचा त्या तरुणाशी विवाह झाला आणि त्याला अर्ध राज्य बक्षीस देण्यात आलं. मिळालेल्या अर्ध्या राज्यात तो तरुण आणि राजकुमारी सिद्धी आनंदाने राहू लागले.

राजकन्येच्या विवाहानंतर राजाचे लक्ष कही राजकारभारात लागेना म्हणून त्याने काही वर्षातच उरलेलं अर्ध राज्यही बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभर तशी दवंडीही पिटवली.  पुन्हा राजसभेचं आयोजन झालं, राज हत्तीला रिंगणात उभ करण्यात आलं. ” राज हत्तीची मान जो होकारार्थी आणि नकारार्थी हालवून दाखवेल त्यालाच अर्ध राज्य बक्षीस दिल जाईल.” अशी घोषणा झाली. अनेक राजे, महाराजे, वीरपुरुष, शूरयोद्धे यांना संधी मिळूनही यावेळीही पराभव स्वीकारावा लागला आणि सुवर्ण संधीची माळ  सगळ्यात शेवटी राजाचा एकमेव जावई झालेल्या त्या शांत आणि संयमी तरुणाच्या गळ्यात येऊन  पडली तसा सगळा दरबार पुन्हा एकदा तरुणाकडे आशेने पाहू लागला. रिंगणाजवळ जाताच ब्राम्हण आणि हत्तीची नजरा- नजर झाली. तरुण आता सुदृढ आणि चपळ झाला होता. अत्यंत कुशलतेने तो  हळूच न कळत हत्तीच्या पाठीवर जाऊन बसला आणि हत्तीच्या कानात हळूच म्हणाला, ” मला ओळखलस ???” हत्ती म्हणाला’ ” हो.”, मग पुढे तरुण म्हणाला, “शेपूट ओढू” , हत्ती म्हणाला “नको”.  राजाच्या पण सांगितल्याप्रमाणे पूर्ण झाला, पुन्हा एकदा बुद्धिवादी तरुणाने अर्ध राज्य जिंकलं आणि शक्तीपुढे बुद्धीचं पारडं पुन्हा जड झालं.

म्हणूच मित्रहो, कुणाच्या दिसण्यावरून, असण्यावरून कधीही कुणाची निंदा करू नका. प्रत्येकाचं स्वतःच असं स्व-कौशल्य असतं. 

ज्याकडे बुद्धी आहे, त्याकडे शक्ती नसेल किंवा ज्याकडे शक्ती आहे त्याकडे बुद्धी नसेल. अपवादाने या दोन्ही गोष्टी एकत्र असतील तरीही आपल्याकडे त्या संभाळण्यासाठीची नम्रता हवी.


शुभं भवतू ….. कृष्णार्पणमस्तु
©™ श्री. अनुप साळगांवकर- दादर, मुंबई